संदेश

प्रत्येकाच्या कपाळी म्हणे
भाग्य लिहिलेलं असतं
आठ्या पाडून म्हणूनच ते
चुरगळायचं नसतं

Monday, October 11, 2010

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती.

युवकांचा आदर्श - शिवाजीराव भोसले (भाग ४)


स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील काही नाट्यपूर्ण घटनांभोवती अनेकांचे मन घोटाळत रहाते. त्यांच्या विचारांची उत्तुंगता लक्षात घेतली जात नाही. रामकृष्णांचा दिव्य स्पर्श, शिकागोचे ते विख्यात भाषण, भगिनी निवेदिताचे भावसमर्पण अशा अनेक घटनांनी वाचक भारावून जातात. त्यांचे विचारधन हे दुर्लक्षित रहाते. स्वामी विवेकानंदांचे उपलब्ध साहित्य नऊ इंग्लिश खंडांत विस्तारले आहे. अजूनही काही भाग अप्रकाशित आहे.

स्वामी जन्मभर बोलत राहिले. गुडविनसारखे लघुलेखक त्यांचे शब्द झेलत राहिले. एखाद्या वॉल्डो बाई हाती पेन घेऊन त्यांया पायाशी बसल्या. स्वत: विवेकानंदांनी हाती लेखणी घेऊन लिहिली ती फक्त पत्रे. उरले-सुरले त्यांचे विचारधन कागदावर उमटले ते त्यांच्या शिष्यांमुळे.


स्वामी रंगनाथानंद हे त्यांच्या जीवनाचे भाष्यकार जगभर फिरले. वयाची 94 वषेर् पुरी करून नुकतेच कालवश झाले. त्यांचे अमोघ इंग्लिश वक्तृत्व पाहून थक्क झालेले श्रोते त्यांना विचारत : स्वामी हे भाषाप्रभुत्व, विचारप्रभुत्व कसे आणि कधी संपादन केले? यावर स्वामी रंगनाथजी म्हणत: ''मी कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर नाही. मात्र मी विवेकानंद साहित्य सुमारे साठ वेळा वाचून काढले आहे. या पारायणाने मला हे प्रभुत्व दिले.'' स्वत: स्वामीजी केवळ एक पदवीधर होते. तरीही त्यांनी जग जिंकले. ते कसे? ते आजन्म व्रतस्थ राहिले. ब्रिटानिका ज्ञानकोशाचे दहा खंड त्यांनी वाचले होते. ते सर्व त्यांच्या लक्षात होते. जगातील अनेक अक्षर साहित्यकृती त्यांनी आत्मसात केल्या होत्या.


समर्थ रामदास म्हणत : ''अभ्यासे प्रकट व्हावे। नाहीतर झाकोनी असावे। प्रकट होऊनी नासावे। हे बरे नव्हे।।'' तुकाराम महाराज हेच सांगून गेले : ''असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।।''


एका जागेवर सलगपणे, सहजपणे व सुखाने किमान तीन तास स्थिर राहिल्याशिवाय आसनसिद्धी प्राप्त होत नाही, असे पतजलींसारखे योगाचे अभ्यासक सांगतात.


स्वामी विवेकानंदांना ही बैठक साध्य झाली होती. एक परिभ्रमणशील परिव्राजक हा त्यांचा लौकीक होता. पण जेथे ते जातील, रहातील, असतील त्या जागी स्वामी लगोलग आसनस्थ होऊन वाचन, मनन, चिंतन, ध्यानधारणा या प्रक्रियांचा आश्रय घेत.


शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतील ज्या पहिल्याच भाषणाने ते विश्वविख्यात झाले ते भाषण साडेचार मिनिटांचे व सुमारे पाचशे शब्दांचे आहे. या शब्दशक्तीला काय म्हणावे? ती आली कोठून? या प्रश्ानंचा मागोवा घेणारांना अंतर्मुख व्हावे लागेल.


स्वामीजी राजकारणापासून निग्रहपूर्वक दूर राहिले. राजकारणात शब्दांची फिरवाफिरव व भूमिकांची धरसोड फार घडते. स्वामीजींच्या वृत्तीत किंवा प्रकृतीत राजकारण मुळातच नव्हते. मात्र त्यांचे देशप्रेम निष्कलंक होते. ते म्हणत : ''दि सॉइल ऑफ इंडिया इज दि हायस्ट हेव्हन टु मी.'' भारताची धरती, रेती व माती मला स्वर्गासमान वाटते.


त्यांच्या लेखी भारत ही पुण्यभूमी होती. जीवन ही एक अनुभवयात्रा होती.


सुभाषचंद बोस म्हणत : आज स्वामीजी असते तर मी त्यांच्या पायाजवळ थांबलो असतो. विवेकानंद हे सुभाषचंदांचे दैवत होते.


विवेकानंद परदेशातून परत आल्यावर, एकदा काँग्रेस अधिवेशनासाठी कलकत्ता येथे गेलेले लोकमान्य टिळक बेलूर मठात जाऊन त्यांना मुद्दाम भेटले. महात्मा गांधींनी भेटीचा प्रयत्न केला; पण स्वामीजी आजारी असल्यामुळे त्यांची भेट घडू शकली नाही. बंगालमधले अनेक क्रांतिकारक त्यांचा 'राजयोग' एकाग्रतापूर्वक वाचत. तुरुंगात अडकून पडलेल्या देशभक्तांना विवेकानंदांचा मोठा आधार वाटे. रवींदनाथ टागोर मोठ्या भक्तिभावाने विवेकानंद चरित्राचे चिंतन करीत.


1963 साली देशभर विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी झाली. नंतर थोड्याच दिवसांनी कन्याकुमारी येथे स्वामीजींचे भव्य स्मारक उभे करण्यात आले. त्याच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान उपस्थित राहिले. प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी कन्याकुमारीच्या परिसरात दाखल झाले.

विवेकानंद राजकारणापासून दूर राहिले खरे; पण सर्व राजकारणी लोकांना ते वंदनीय वाटले. राजकारणी लोकांनी ज्याच्यापुढे नतमस्तक व्हावे असा परमविरक्त तपस्वी हा युवकांचा आदर्श ठरावा असे राजीव गांधी म्हणाले होते.


गढूळ राजकारणाला ज्यांच्या नामोच्चाराने निर्मळपणा प्राप्त व्हावा असे विवेकानंद स्वत: आजन्म राजकारणापासून दूर राहिले. विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवादिन म्हणून पाळावा, या निष्कर्षाप्रत शासनही येऊन पोहोचले.

( क्रमश:)


- प्राचार्य शिवाजीराव भोसले

No comments:

Post a Comment